गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या नद्या नाले तुडुंब वाहत आहेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या काही भागात ही पूरस्थिती हळूहळू निवळताना दिसत आहे.
पूर्व विदर्भात पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागांमध्ये पुराचे पाणी वेगाने ओसरू लागले आहे. त्यामुळे आजपासून महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुर्दैवाने, दोन दिवसात पुरामुळे पूर्व विदर्भात पाच जण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल आणि कठानी या पाच नद्यांना सध्या दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे या ठिकाणची पूर परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील दोन राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि तालुकास्तरावरील २२ रस्ते बंद करण्यात आले आहेत. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चामोर्शीतील चिचडोह धरण १०० टक्के पूर्ण भरले आहे. गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरचा वैनगंगा नदीला मोठा प्रभाव जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांत वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. सध्या पाऊस थांबला असला तरी, वैनगंगा नदीचे पाणी प्राणहिता व इतर नद्यांमध्ये जात असल्यामुळे प्राणहिता नदीत पूर परिस्थिती वाढत आहे.
गडचिरोलीच्या जिल्हा मुख्यालयाशी चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा हे सहा तालुके संपर्काच्या बाहेर आहेत. चामोर्शी आणि आष्टी येथून मार्ग बंद असल्यामुळे, विशेषतः चामोर्शीपासून वैनगंगा नदीला पूर आल्याने या तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















