चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने तब्बल 42.6 अंश सेल्सियसचा उच्चांक गाठला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या या कडक उन्हाचा परिणाम आता जंगलातील वन्यजीवांवरही स्पष्टपणे जाणवू लागला आहे.
पाण्याच्या शोधात भटकंती करताना चंद्रपूर शहराच्या सीमेवरील वनउपज नाका परिसरात हरणांची एक जोडी थेट मुख्य रस्त्यावर (हायवे) आल्याचे दृश्य समोर आले. अचानक रस्त्यावर हरणे दिसताच वाहनचालकांनी तत्काळ गाड्या थांबवल्या. काही सजग नागरिकांनी हरणांना पुन्हा जंगलाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना चंद्रपूर–मूल महामार्गावरील जंगलमार्गावर घडली असून या भागात वारंवार वन्यप्राण्यांची वर्दळ दिसून येते. मात्र, भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका कायम असतो.
सध्या वाढत्या तापमानामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटत चालले आहेत. त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















