चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली वनक्षेत्रात सध्या वाघाच्या वाढत्या हालचालींमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे तेंदूपत्ता संकलनासाठी मोठ्या प्रमाणावर मजूर जंगलात जात असले, तरी यंदा वाघाच्या दहशतीमुळे त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जंगल परिसरात वारंवार वाघाचे दर्शन होत असून, अनेक ठिकाणी त्याचे पगमार्क (ठसे)ही आढळले आहेत. यामुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काही मजूर जंगलात जाणे टाळत आहेत. मात्र, आर्थिक गरजेमुळे अनेकांना जीव धोक्यात घालून कामावर जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जंगलात नियमित गस्त वाढवणे, मजुरांना सुरक्षा मार्गदर्शन देणे, तसेच संवेदनशील भागांमध्ये आवश्यक संरक्षणात्मक उपाय करणे अत्यंत गरजेचे असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.
दरम्यान, दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या गंभीर विषयावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस चंद्रपूर वनविभागाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला तसेच वन अधिकारी कुशाग्रह पाठक उपस्थित होते. बैठकीत मजुरांच्या सुरक्षेबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
वन विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत लवकरच आवश्यक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, चिचपल्ली वन परीक्षेत्रातील नागरिकांनी या विषयात लक्ष घातल्याबद्दल माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















