चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
देशाचे ‘टायगर कॅपिटल’ म्हणून ओळख असलेल्या विदर्भातील चंद्रपूर जिल्हा येथे मानव आणि वन्यजीव संघर्ष गेल्या काही वर्षांत चिंताजनकरीत्या वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २०२५ च्या डिसेंबरअखेर या संघर्षात सुमारे ४७ जणांचे बळी गेले, तर गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १९७ वर पोहोचली आहे.
शेतीच एकमेव पर्याय, दहशतीत शेतकरी
पूर्व विदर्भातील धानपट्ट्यात औद्योगिकीकरणाचा अभाव असल्याने शेती हाच प्रमुख रोजगाराचा पर्याय आहे. पहाटेपासून शेतकरी व शेतमजूर शिवारात जात असतानाच वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी गावागावांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी शेतजमिनी पडीत ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सर्वाधिक हल्ले या तालुक्यांत
वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यांच्या सर्वाधिक नोंदी सिंदेवाही, ब्रह्मपुरी, सावली, मूल, राजुरा, गोंडपिंपरी आणि भद्रावती या तालुक्यांत झाल्याचे दिसते. वन विभागाकडून जागृती व विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही, अशी स्थानिकांची भावना आहे.
अभ्यासकांचे मत
वन्यजीव अभ्यासक संजय करकरे यांच्या मते, “वाघ हा जन्मतः नरभक्षक नसतो. मात्र बेसावध अवस्थेत असलेल्या व्यक्तींवर हल्ला होऊ शकतो. मानवावर हल्ल्यांची संख्या वाढल्यास त्या वाघाला रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलवले जाते.”
त्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातून १५ वाघ गोरेवाडा येथे स्थलांतरित करण्यात आले आहेत. मात्र, इतर व्याघ्र प्रकल्पांची वहनक्षमता (कॅरिंग कॅपॅसिटी) विचारात घेऊनच पुढील नियोजन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संघर्षात गेलेले जीव…
दयाराम गोडाने, बंडू कोल्हे, शामराव मंगाव, नीलेश कोरेवार, मलाजी एगावार, मनोहर चौधरी, शेषराव नागोसे, भूमिता पेंदाम, विनायक जांबुडे, मारुती बोरकर, दिवाकर जुमनाके, शुभांगी चौधरी, कांता चौधरी, रेखा शेंडे, विमल शेंडे, भुवनेश्वरी भंडारे, कचराबाई भरडे, ऋषी पेदूर, मारुती शेंडे, बंडू उराडे, संजीवनी मकलवार, सुरेश सोपनकार, जयदेव करणेकर, मारुती मसराम, घनश्याम उंदीरवाडे, अरुण कुकसे, पांडुरंग ससाने, अन्नपूर्णा बिलोने, सुनील राऊत, विद्या मसराम, प्रशिल मानकर, अमोल ननावरे, भाऊजी पाल, वासुदेव वटे, अलका पेदूर, नीलकंठ भुरे, ईश्वर भरणे, भास्कर गजभिये, आबा गेडाम, रमेश कोमलवार, शेषराव झाडे, छाया राऊत, पितांबर सोयाम, सहाजू बीलठेरिया, प्रेमसिंग दुखीउदे, बुदसिंग मडावी.
पुढील वाटचाल?
मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी केवळ जागृती नव्हे तर शिवार सुरक्षा, रात्रपाळीतील हालचालींवर नियंत्रण, जलद रेस्क्यू यंत्रणा, नुकसानभरपाईची तातडीची अंमलबजावणी आणि व्याघ्र प्रकल्पांची क्षमता लक्षात घेऊन स्थलांतर—या सर्व बाबींवर समन्वयाने काम करण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















