मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल शहरातील निर्दोष सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुनिल कालिदास गेडाम यांच्या निर्घृण हत्येनंतर संतापाची लाट उसळली आहे. शहरातील नागरिकांनी शासन व प्रशासनाला निवेदन देत या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी भिमवाडी वसाहत भागात सुनिल गेडाम यांची निघृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण मूल शहर हादरले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. यंदाच्या वर्षात मूल तालुक्यात तब्बल सहा हत्यांची प्रकरणे घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शांतताप्रिय गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल शहरात गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन व तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळत असून, मूल परिसर गुन्हेगारांचे अड्डे बनत चालले आहेत. यावरून स्थानिक पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था टिकविण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत पुढे म्हटले आहे की, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मगाव असलेल्या मूल शहरात निर्दोष नागरिकांची हत्या होणे हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणाची काटेकोर चौकशी करून, शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी दबंग व निर्भीड पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच परप्रांतीय व तडीपार संशयितांची तपासणी करून त्यांना शहरातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी इशारा दिला आहे की, या प्रकरणात पोलीस प्रशासनाने दिरंगाई किंवा टाळाटाळ केल्यास मूल वासीय जनता रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















