मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या अचानक वादळी पावसामुळे मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना समोर आली असून, प्रभावित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मूल तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल येथे जमा केले होते. मात्र सदर धान्य सुरक्षित गोडाऊन किंवा शेडमध्ये न ठेवता खुल्या आवारात ठेवण्यात आल्याने वादळी पावसात धान्य भिजून मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतमालाच्या सुरक्षेची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची असताना निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत भाजपा महामंत्री प्रशांत बोबाटे यांनी माननीय तहसीलदार, मूल यांना निवेदन देऊन घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसानभरपाई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी राकेश ठाकरे, युवराज चावरे, वंश बोबाटे, अमोल येलंकीवार सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनाची प्रत माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनाही देण्यात आली असून प्रशासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















