भामरागड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी या दुर्गम आदिवासी गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्याच्या तब्बल ७९ वर्षांनंतर प्रथमच परिवहन महामंडळाची बस या गावांमध्ये पोहोचली आणि गावकऱ्यांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले.
बस गावात दाखल होताच नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत तिचे जल्लोषात स्वागत केले. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते—कारण आता रोजची कठीण पायपीट संपणार, अशी आशा निर्माण झाली आहे.
तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी ही गावे नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम असल्यामुळे अनेक वर्षे येथे पक्के रस्ते नव्हते. परिणामी, वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने नागरिकांना खाचखळग्यांच्या मार्गाने पायपीट करत प्रवास करावा लागत होता. मात्र, गडचिरोली पोलिस दलाने पोलिस अधीक्षक नीलोत्प्ल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा पुरवून रस्ते बांधकाम पूर्ण केले आणि आज अखेर या भागात बस सेवा सुरू झाली.
अहेरी आगारातून सुटलेली बस तुमरकोठीत पोहोचताच विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. तुमरकोठी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोरखनाथ सुरासे यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री लेकामी, गावपाटील रामजी मट्टामी, चिन्ना मट्टामी आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
या बससेवेने आता शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी गावकऱ्यांच्या दारी येणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















