मुंबई : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांतील काँग्रेसच्या यशावरून पक्षात श्रेयवाद उफाळून आला असून, हा वाद आता उघडपणे समोर आला आहे. “चंद्रपूरमध्ये ‘टायगर जिवंत आहे’, असे सांगत विजयाचे श्रेय घेतले जाते, मग गडचिरोलीत टायगर मेलेला होता का? गडचिरोली हा माझा लोकसभा मतदारसंघ नाही का?” अशा तीव्र शब्दांत प्रतिभा धानोरकर यांनी संताप व्यक्त केला.
मुंबईत गुरुवारी झालेल्या काँग्रेस संसदीय बोर्डाच्या बैठकीत त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. नगरपरिषद निवडणुकांतील चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या यशाचे श्रेय केवळ आमदार विजय वडेट्टीवार यांनाच दिले जात असल्याच्या मुद्द्यावरून बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्षांनी वारंवार विनंती करूनही खासदार धानोरकर शांत झाल्या नाहीत. निवडणूक निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेता कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आगामी निवडणुकांमध्ये तिकीट कापण्याचा प्रयत्न होत असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, चंद्रपूर व बल्लारपूर शहराध्यक्ष बदलताना आपल्याला अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप करत, महानगरपालिका निवडणुकीसाठी यशोमती ठाकूर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करतानाही विश्वासात घेतले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
या घडामोडींमुळे चंद्रपूर–गडचिरोली पट्ट्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वर्चस्वाची लढाई पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















