चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप व काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी उफाळून आल्याने निवडणूक समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. दोन्ही पक्षांतील नाराज उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे अनेक प्रभागांत अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, याचा थेट फटका पक्ष नेतृत्वाला बसत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या उमेदवार यादीतील अनेकांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. तसेच काँग्रेसमधील तब्बल नऊ बंडखोर उमेदवारांनीही माघार न घेतल्याने दोन्ही पक्षांची अडचण वाढली आहे.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण ८३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता १७ प्रभागांतील ६६ नगरसेवक पदांसाठी ४५१ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. वाढलेली अपक्षांची संख्या पाहता, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वाधिक चर्चेत असलेल्या महाकाली प्रभागात शहर काँग्रेस अध्यक्ष संतोष लहामगे आणि काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांच्यात थेट लढत होत आहे. काँग्रेसचे नागरकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने या प्रभागात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
विठ्ठल मंदिर प्रभागात काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत दानव, तर वडगाव प्रभागात काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष तथा सलग पाच वेळा नगरसेविका राहिलेल्या सुनिता लोढिया यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने काँग्रेस समर्थित जनविकास सेनेच्या उमेदवारांची अडचण वाढली आहे.
याच विठ्ठल मंदिर प्रभागात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर तसेच बाळू कोतपल्लीवार यांनी पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. शिवाय, याच प्रभागात मुग्धा गायकवाड यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून उमेदवारी घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या यादीत समाविष्ट असलेले प्रभाकर सहारे, सुनील डोंगरे, पूजा पोतराजे, अजय सरकार, माया उईके, सोहम बुटले, शुभांगी दिकोंडवार, मनीष बावणे, कुणाल गुंडावार, पंचशीला चिवंडे, हरीष मंचलवार व वंदना भागवत यांनीही उमेदवारी कायम ठेवत बंडखोरीचा सूर कायम ठेवला आहे.
दरम्यान, एकोरी प्रभागात काँग्रेसच्या माजी नगरसेविका विना खनके यांच्यासह सकिना अन्सारी, अशोक नागपुरे व देवेंद्र बेले या माजी नगरसेवकांनी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांकडून उमेदवारी कायम ठेवली आहे.
एकूणच भाजप व काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरीमुळे महापालिका निवडणूक अधिक चुरशीची, अनिश्चित आणि रंगतदार झाली असून, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















